आधार प्रमाणिकरण प्रक्रिया चालेना “सर्व्हर “च्या सततच्या खराबीमुळे शेतकंऱ्याच्या कामाचा होतोय खोळंबा….!
सोमराज बडे,पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागात २०२१या वर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या अनुदानापासून तालुक्यातील काही ठराविक गावातील शेतकरी वंचित राहिले होते. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे , कागदपत्रे दाखल केल्यानंतर ही त्यांना अनुदान मिळत नसल्याने शेतकरी मागील दोन वर्षांपासून हैराण झाले होते . अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने सरकारने दिले होते .
काही ठिकाणी अनुदान जमा करण्यात आले होते . मात्र अद्यापही टाकळी मानूर,अंबिका नगर,मानेवाडी , वडगाव , जोगेवाडी , चिंचपूरपांगुळ ,ढाकणवाडी(वडगांव)चुंबळी,तीनखडी,इत्यादी.गावातील शेतकरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सन २०२१ च्या अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहिले होते . याबाबात अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात वारंवार विचारणा देखील केली होती.
तश्या स्वरूपाचे अनेक वेळा आम्ही वृत्त देखील प्रसारित केले होते.याचीच दखल प्रशासनाने घेत सदरचे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची अंतिम यादी तयार करून दिली आहे.
मात्र अनुदान खात्यात जमा करण्यासाठी आधार प्रमाणीकरण ( KYC )प्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र सदरची वेबसाईट चालत नसल्याने शेतकऱ्यांना काम बुडवून सेतू केंद्राबाहेर दिवस भर वाट पाहत बसावे लागत आहे.
आधार प्रमाणीकरण प्रक्रिया (के.वाय.सी.) पूर्ण झाल्याशिवाय अनुदान खात्यात जमा होत नाही.शिवाय काही शेतकऱ्यांचे यादीत नावेच नाहीत तर ,वेबसाईट चालत नसल्याने नावे असनारे शेतकरी वैतागले आहेत.शासनाने आमचा खेळ मांडला आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी दिसत आहेत.
शेतकरी सेतू केंद्रात हेलपाटे मारून अगदी मेटाकुटीला आले आहेत.याची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन सदर पोर्टलची योग्य ती सुधारणा करून शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्वरित देण्याची मागणी करण्यात येत आहे.यासाठी सरकारने या प्रकाराकडे लक्ष द्यावे असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.