Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे
पाथर्डी/ प्रतिनिधी :- .कोणत्याही क्षणी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊ शकतात.शासकीय कर्मचारी,पोलीस प्रशासन त्या कामात गुंतणार असल्याने यात्रेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देता येणार नाही. देवस्थान समितीने यात्रा कालावधीत ग्रामस्थांच्या सहभागातून अतिरिक्त वाढीव स्वयंसेवक यात्रा कामासाठी नियुक्त करावेत.यासाठी गरज पडल्यास अशा स्वयंसेवकांना पोलिसांकडून प्रशिक्षण दिले जाईल.अशी माहिती प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी यावेळी दिली .
श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांची यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत अशी पंधरा दिवस चालते. राज्यासह शेजारील राज्यातील भाविक सुद्धा मोठ्या संख्येने येऊन विविध धार्मिक विधी करतात. तीन टप्प्यात चालणाऱ्या यात्रेचा रंगपंचमी हा मुख्य दिवस असतो. यात्रा कालावधीमध्ये यात्रेवर प्रशासनाचे नियंत्रण असते.आज विविध शासकीय यंत्रणांच्या प्रमुखासह देवस्थान समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक मढी येथे कानिफनाथ गडावर संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी प्रसाद मते होते. यावेळी तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, यासह परिवहन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, वनविभाग, वीज वितरण, नगरपालिका अशा प्रमुख विभागाचे प्रतिनिधी, मढी देवस्थान अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड, बबन मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, सचिव विमलताई मरकड, भाऊसाहेब मरकड, विश्वस्त अर्जुन शिरसाट, सचिन गवारे, डॉ. विलास मढीकर, वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, डॉ. रमाकांत मडकर, ग्रामपंचायत सदस्य भानूविलास मरकड, पोपट घोरपडे, चंद्रभान पाखरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष संजय मरकड म्हणाले, देवस्थान समितीने भाविकांना दर्शनबारीमध्ये दुष्काळ परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे. वांबोरी चारीचे पाणी तलावात सोडा. तसेच जल जीवन योजनेमधून कासार पिंपळगाव ते मढी पाईपलाईन योजना मंजूर असून तेथील विहिरीच्या जागेबाबत प्रशासनाने तात्काळ परवानगी दिल्यास यात्रे अगोदर पाईपलाईन पूर्ण होऊन यात्रेसाठी भाविकांना पाणी देता येईल .वीज वितरण करून यात्रा कालावधीत भार नियमन करू नये. मढी ते तिसगाव व मढी ते फुलोराबाग रस्ता प्रचंड खराब झाला असून यात्रा अगोदर त्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे .दोन वर्षापासून जनजागृती करून पशुहत्या बंदी करण्यात आली असून यावर्षीही पशु हत्या बंदी कायम राहणार असल्याचे सरपंच संजय मरकड यांनी सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे म्हणाले की, ग्रामपंचायत व देवस्थान हद्दीत व्यावसायिकांसाठी देण्यात येणाऱ्या जागा रस्ता सोडून द्याव्यात. मच्छिंद्रनाथ व तिसगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर एकही दुकानाला जागा देऊ नये. त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल. परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेत पार्किंग व्यवस्था करावी. होळी, रंगपंचमी व फुलोरबाग या मुख्य व भाविकांच्या गर्दीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. समाजकंटक, चोर, खिसेकापू आदींपासुन भाविकांना त्रास होणार नाही यासाठी तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवला जाईल असे आयोजन करण्यात आले आहे .
यात्रा कालावधीत प्रचंड गर्दीमुळे मोबाईल मनोऱ्यावर अतिरिक्त ताण पडून भाविकांचे मोबाईल बंद होवून संपर्क तुटतो.त्यामुळे संबंधित कंपनीला कळवून ठिकठिकाणी मोबाईल टॉवरच्या व्हॅन उपलब्ध कराव्यात. तसेच पंढरपूरच्या धरतीवर फिरते शौचालय प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ भानूविलास मरकड यांनी केली.भाविकांच्या संख्येनुसार जादा बसेसची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे परिवहन मंडळाच्या वतीने सांगीतले .
👉👉👉“दुष्काळामुळे मढी यात्रेवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे . यात्रेसाठी प्रशासनाने टप्प्याटप्प्याने टॅंकर उपलब्ध करून द्यावेत .टँकरचे पाणी परिसरातील विहिरीत आणि टाक्यामध्ये सोडून भाविकांना पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.”