👉कर्जत पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
कर्जत – कर्जतच्या एका आडत दुकानदाराने शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी बॅंकेतून दहा लाखांची रोकड काढली होती. ही रक्कम दुचाकीवरून बॅगमध्ये मार्केटकडे घेऊन येत असताना दोन हमाल कामगारांनी ही बॅग हिसकावून पळवून नेल्याची घटना घडली होती. या दाखल गुन्ह्यातील तत्परतेने आरोपीस पकडून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रमोद विजय आतार (सध्या रा.कोरेगाव ता.कर्जत) असे पकडण्यात असल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, पियुष रविंद्र कोठारी (रा.कर्जत) यांचे शेतकरी मार्केट कर्जत येथे आडत दुकान आहे.शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी कर्जत येथील अर्बन बॅंकेतून त्यांनी १० लाखांची रोकड आपल्या ताब्यात घेऊन ती बॅगमध्ये ठेऊन मोटार सायकलवर मार्केटकडे येत होते. कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांच्याच दुकानात हमालीचे काम करणारे कामगार सोमनाथ विठ्ठल साळुंखे (वय २७), व प्रमोद विजय आतार (वय १९, दोघेही रा.कोरेगाव ता.कर्जत) यांनी मोटार सायकलवर असलेली बॅग हिसकाऊन पळवून नेली असल्याची अशी फिर्याद पियुष कोठारी यांनी दि.४ ऑक्टोबर रोजी दिली होती. आरोपींचा शोध घेणे आता कर्जत पोलिसांसाठी आव्हानच होते, त्या अनुषंगाने कर्जत पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावली. तपास केल्यानंतर घटनेतील आरोपी प्रमोद विजय आतार सध्या रा.कोरेगाव ता.कर्जत हा दि.२९ रोजी पोलिसांना पकडण्यात यश आले, पण साथीदार सोमनाथ साळुंखे हा फरार आहे. अटक असलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.कर्जत पोलिसांनी त्यास २९ ऑक्टोबर रोजी अटक करून ३० ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि.८ नोव्हेंबर पर्यंत ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीवर यापूर्वीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, सतीश बाधित, पोकाॅ श्याम जाधव, आण्णासाहेब चव्हाण, उद्धव दिंडे, पांडुरंग भांडवलकर, सचिन वारे, सुनिल खैरे , गोवर्धन कदम, शाहूराज टिकटे, भाऊ काळे, शकील बेग, नितीन नरुटे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, सचिन वारे हे करत आहेत.
👉कर्जत शहर व तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येते की व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात कामासाठी कामगार ठेवत असताना त्याचा पूर्वइतिहास पाहून घेतला पाहिजे. आवश्यकतेप्रमाणे स्थानिक पातळीवर विचारपूस केली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. चुकीचे काम करणारे कोणीही असो त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई होणारच.
–चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत पोलीस स्टेशन.