तालुक्याला जोडला जाणारा मुख्य रस्ता काम तसेच,विविध विकास कामे सुरू झाल्याने ग्रामस्थ समाधानी.
Nagar Reporter
Online news Natwork
सोमराज बडे,पाथर्डी :-मागील विधानसभा निवडणुकीत पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी (वडगांव)या गावाने संपूर्ण मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्याची पुनश्च पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता खबरदारी म्हणून अ.नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ढाकनवाडी ग्रामस्थांशी चर्चा करत संवाद साधला.ढाकनवाडीला दळनवळणासाठी रस्ताच नसल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे याठिकाणी एकसुद्धा मतदान झाले नव्हते याचीच दखल घेत शनिवारी(दि१३)रोजी जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ यांच्यासह जिल्हा प्रशासनाने पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील मतदान केंद्राची पाहणी करून ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा केली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, प्रांतधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी ढाकणवाडी गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी उपसरपंच रवींद्र ढाकणे पंचायत समितीचे उपअभियंता अनिल सानप, ग्रामसेवक रोहिदास आघाव, तलाठी मनोज खेडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांचे मत परिवर्तन करण्यात प्रशासनाला यश आले असून,आतातरी रस्ता तयार करण्यात येईल या आशेवर आम्ही या निवडणुकीत आम्ही मतदान करू, असे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
त्यानंतर येथील बेलपारा प्रकल्पातील गाळ काढणे बाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी अधिकार्यांना सूचना देत जिल्हाधिकारी मार्गस्थ झाले.
‘लोकशाही मजबूत करा’.-सालीमठ,जिल्हाधिकारी अ.नगर.
“ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे मुख्य रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.तसेच विविध विकासकामे मार्गी लागली असून निवडणुकीनंतर आणखी काही कामे पूर्ण होणार आहेत. सर्वांनी मतदान करून शंभर टक्के मतदान करत आपले योगदान देत,आपला हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.”