ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई – देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे अभिनेत्री कंगना रणौतला चांगलेच महागात पडणार आहे. आम आमदी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या प्रीती मेनन यांनी कंगनाच्या वादग्रस्त विधानाविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली असून कलम ५०४, ५०५ आणि १२४अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एका खाजगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने १९४७ साली देशाला मिळाले स्वातंत्र्य हे भीक असून देशाला खरे स्वातंत्र्य २०१४मध्ये मिळाल्याचे कंगनाने म्हटले. कंगनाच्या मुलाखतीतील २४ सेकंदाची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर सर्व स्थरातून कंगनावर टिकेची झोड उठली आह. कंगनाला नुकताच पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार रद्द करावा अशा मागणीने जोर धरला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी कंगनाने १९४७च्या स्वातंत्र्य योद्धांनी स्वत:चे जीवन समर्पित केले त्याचा अपमान केला आहे त्यामुळे कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार रद्द करण्यात यावा अशी आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली असून मी राष्ट्रपतींकडे याबाबत मागणी करणार असल्याचे देखील नीलन गोऱ्हे यांनी म्हटले आहे. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यांवर कंगनावर होणारी टीका ही काही नवीन नाही. कंगनाने मुलाखतीत देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानानंतर माझ्या विरोधात आणखी दहा एफआयआर दाखल होतील, असे म्हटले होते.
मुलाखतीत कंगनाने म्हटले होते की, मी जेव्हाही राष्ट्रवादावर बोलते, सैन्याबाबत बोलते तेव्हा मला मी भाजपचा अजेंडा चालवते असे म्हटले जाते. हा भाजपचा अजेंडा नाही हा देशाचा अजेंडा आहे. मला काँग्रेसची सत्ता असताना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आल्याचे कंगनाने म्हटले.